Breaking

Sunday, October 26, 2025

“बॅच 1980” ची 45 वर्षांनी भावनिक पुनर्भेट -श्री उमा विद्यालयात स्नेहाचा महोत्सव! (गेट टू गेदर )


जुने मित्र, गोड आठवणी आणि ‘पसायदान’च्या स्वरांनी भरलेला अविस्मरणीय दिवस!

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

मोडनिंब येथील श्री उमा विद्यालयात “बॅच 1980” चा गेट-टुगेदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल 45 वर्षांनंतर एकत्र जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत आनंदाचा वर्षाव केला.

या गेट-टुगेदरचे सुयोग्य व सुंदर नियोजन सारंग शहा आणि मंजू पुरवत यांनी केले होते. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित पार पडला. सर्वांमध्ये अनेक दिवसांपासून असलेली “एकमेकांना भेटण्याची आतुरता” अखेर या भेटीत पूर्ण झाली.

रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला हा सोहळा दुपारी साडेचार वाजेपर्यंत चालला. या भेटीला सुमारे 35 ते 40 माजी विद्यार्थी उपस्थित होते. मुंबई, सोलापूर, पंढरपूर, नातेपुते, अकलूज, पुणे, कलबुर्गी, खंडाळी, बारामती अशा विविध ठिकाणांहून माजी   विद्यार्थी खास या प्रसंगी जमले होते.


सकाळी सर्वजण प्रथम श्री उमा विद्यालयात एकत्र जमले. त्यानंतर त्यांच्याच बॅच चा त्यांचा मित्र प्रकाश गायकवाड यांच्या ‘ओंकार पॅलेस’ हॉटेलमध्ये चहा-नाश्ता घेऊन सर्वांनी पुन्हा शाळेत येऊन मुख्य कार्यक्रमास सुरुवात केली. ओळख परेडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतच्या आठवणींना उजाळा देताना वातावरण भावनिक झाले.
प्रमुख पाहुण्या म्हणून जि.प.शाळा,मोडनिंब येथील निवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सौ. इंदुमती पांढरे उपस्थित होत्या. तसेच श्री. कुलकर्णी (निवृत्त अधिकारी, बँक ऑफ बडोदा, पुणे) यांनीही हजेरी लावून सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले.


या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब देशमुख, प्रकाश गायकवाड, सारंग शहा, तसेच मंजू पुरवत, सुलभा पांढरे, बेबी बिनगे, गुरुनाथ जाधव, जयबुन, जयश्री सुर्वे, काशीबाई माळी,जयश्री तोडकरी,मनीषा कुलकर्णी, मीना सुर्वे, संध्या भिसे, संगीता कोठारी, सुर्जेराव चव्हाण, वनमाला पाटील, वर्षा उत्पात, विद्या गव्हाणे, विजया निंबाळकर, अशोक सुर्वे, मारुती वाघ, बाळू मुळे, दिलीप वेदपाठक, सुरेश लादे, शिरीष तोडकरी, विलास सुर्वे, उत्तम रणसिंग व बाळासाहेब गुरव असा हा सर्व मित्रगण आणि मैत्रिणी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आणि आत्मीयता प्राप्त झाली.कार्यक्रमादरम्यान या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्य प्रवासातील अनुभव कथन केले. काही क्षणांमध्ये हास्याचे फवारे, तर काही ठिकाणी डोळ्यांत अश्रू अशा भावनिक वातावरणात स्नेहबंधांची सुंदर गुंफण झाली.

सांगता सोहळ्यात सर्वांनी एकत्र येऊन भावपूर्ण ‘पसायदान’ म्हटले. त्यानंतर शाळेच्या आवारात राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा संदेश दिला.तद्नंतर गेट-टुगेदरच्या निमित्ताने काहींच्या इच्छेनुसार सर्व मित्रांनी आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा देत प्रिय मोडनिंब गावाचा फेरफटका मारला. गावातील ओळखीचे रस्ते, शाळेच्या अंगणातील गप्पा आणि जुने कोपरे पुन्हा एकदा त्या सुवर्णक्षणांच्या आठवणीत रंगून गेले.सरतेशेवटी सर्वांनी पुन्हा ‘ओंकार पॅलेस’ हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा आस्वाद घेत गेट-टुगेदरची सांगता केली.कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व माजी विद्यार्थ्यांनी “अशा गोड भेटी दरवर्षी आयोजित कराव्यात” असा निर्धार व्यक्त करत पुढील भेटीचे आश्वासन दिले.